12 जानेवारी दिनविशेष
सप्तरंगी परिपाठ
आज वार- गुरुवार,
दिनांक- 12/01/2023,
मिती- पौष कृ. 5
शके– 1944,
सुविचार- शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही; तो स्वतःहून शिकतो.
म्हणी व अर्थ-
घरोघरी मातीच्या चुली-
सगळीकडे सर्वसाधारण एकच परिस्थिती असते.
आजचा दिनविशेष-
राजमाता जिजाऊ यांची जयंती, स्वामी विवेकानंद यांची जयंती (राष्ट्रीय युवक दिन)
ठळक घटना आणि घडामोडी-
सोळावे शतक-
१५२८ – गुस्ताव पहिला स्वीडनच्या राजेपदी.
अठरावे शतक-
१७०५ – मराठा साम्राज्याची राजधानी सातारा येथे हलविण्यात आली.
विसावे शतक-
१९०८ – पहिला लांब अंतरावर पाठवला गेलेला रेडियो संदेश आयफेल टॉवरवरून प्रसारित झाला.
१९१५ – महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव अमेरिकन संसदेने फेटाळला.
१९२६ – पाश्चर संस्थेने धर्नुवातासाठी लस शोधल्याची घोषणा केली.
१९३१ – सोलापूरचे क्रांतिकारी किसन सारडा, मल्लाप्पा धनशेट्टी व कुरबन हुसेन साचा:जगन्नाथ शिंदेयांना येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली.
१९३६ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची घोषणा केली.
१९९७ – सामाजिक कार्यकर्त्या गंगुताई पटवर्धन यांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा पहिला बाया कर्वे पुरस्कार प्रदान.
१९९८ – एकोणीस युरोपीय देशांनी मानवी क्लोनिंगवर बंदी आणली.
एकविसावे शतक-
२००५ – राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना.
२००६ – हज यात्रेच्या अखेरच्या दिवशी मक्केजवळ मीना येथे प्रतीकात्मक दगड फेकण्याचा विधी चालू असताना झालेल्या चेंगराचेंगरीत ३४५ मुस्लिम भाविकांचा मृत्यू व २९० जखमी.
२०१० – हैतीमध्ये झालेल्या भूकंपात ३,००,००० पेक्षा अधिक मृत्यू.
जन्म-
१५९८ – जिजाबाई, छत्रपती शिवाजीच्या आई.
१८५४ – व्यंकटेश बापूजी केतकर, गणिती व ज्योतिर्विद.
१८६३ – भारतीय तत्त्वज्ञानाची महती जगभर पसरवणारे नरेन्द्रनाथ दत्त उर्फ स्वामी विवेकानंद, भारतीय तत्त्वज्ञ.
१८९२ – मिखाइल गुरेविच, रशियन विमान तंत्रज्ञ.
१८९३ – हर्मन गोरिंग, नाझी अधिकारी.
१८९३ – आल्फ्रेड रोझेनबर्ग, नाझी अधिकारी.
१८९९ – पॉल हर्मन म्युलर, नोबेल पारितोषिक विजेता स्विस रसायनशास्त्रज्ञ.
१९०२ – सौद, सौदी अरेबियाचा राजा.
१९०२ – धुंडिराजशास्त्री विनोद, भारतीय तत्त्वज्ञ, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक.
१९०६ – महादेवशास्त्री जोशी, भारतीय संस्कृतीिोशाचे व्यासंगी संपादक.
१९१८ – सी.रामचंद्र, ज्येष्ठ संगीतकार.
१९१६ – पीटर विलेम बोथा, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष.
१९१७ – महाऋषी महेश योगी, भारतीय तत्त्वज्ञ.
१९४० – डिक मोत्झ, न्यूझीलंडचा क्रिकेट खेळाडू.
१९४९ – हारुकी मुराकामी, जपानी साहित्यिक, अनुवादक.
१९६२ – रिची रिचर्डसन, वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू.
१९७२ – पॉल विल्सन, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
१९७६ – गॅव्हिन रेनी, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू-
१५१९ – मॅक्सिमिलियन पहिला, पवित्र रोमन सम्राट.
१८३४ – विल्यम विंड्हॅम ग्रेनव्हिल, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
१८९७ -सर आयझॅक पिटमॅन – शॉर्टहॅंड या लघुलिपीचे जनक
१९४४ – वासुकाका जोशी, लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी व चित्रशाळेचे विश्वस्त.
१९६६ – नरहर विष्णू तथा काकासाहेब गाडगीळ, स्वातंत्र्यसैनिक, लेखक, वक्ते, राजकीय नेते, केंद्रीय मंत्री आणि पंजाबचे राज्यपाल.
१९७६ – ऍगाथा ख्रिस्ती, प्रसिद्ध रहस्यकथा लेखिका.यांनी लिहिलेल्या माऊस ट्रॅप या नाटकाचा प्रयोग आजही लंडन येथील नाट्यगृहा मध्ये रोज एक तरी प्रयोग सादर केला जातो
१९९२ – पंडित कुमार गंधर्व, हिंदुस्थानी संगीताच्या क्षेत्रातील ख्यातनाम गायक.शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ ’ कुमार गंधर्व’
१९९७ – ओ.पी. रल्हन, हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक व अभिनेते.
२००५ – अमरीश पुरी, भारतीय अभिनेता.– आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त केलेले चित्रपट व रंगमंच कलाकार
प्रतिवार्षिक पालन-
राष्ट्रीय युवक दिन – भारत.
झांझिबार क्रांती दिन – टांझानिया.
राष्ट्रगीत-
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
प्रतिज्ञा-
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि
वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद
भारताचे संविधान
उद्देशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
प्रार्थना-
देह मंदिर चित्तमंदिर
देह मंदिर, चित्तमंदिर, एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरूषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
भेद सारे मावळू द्या वैर सार्या वासना
मानवांच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
मनाचे श्लोक
नव्हे सार संसार हा घोर आहे।
मना सज्जना सत्य शोधूनि पाहे ॥
जनीं वीष खाता पुढे सूख कैचे ।
करी रे मना ध्यान या राघवाचे ॥ ६६ ॥
घनश्याम हा राम लावण्यरूपी ।
महाधीर गंभीर पूर्णप्रतापी ॥
करी संकटी सेवकांचा कुडावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ६७ ॥
बळे आगळा राम कोदंडधारी।
महाकाळ विक्राळ तोही थरारी ॥
पुढे मानवा किंकरा कोण केवा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ६८ ॥
सुखानंदकारी निवारी भयाते।
जनीं भक्तिभावे भजावे तयाते ॥
विवेके त्यजावा अनाचार हेवा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ६९ ॥
सदा रामनामे वदा पूर्णकामे ।
कदा बाधिजेना पदा नित्य नेमे ॥
मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७० ॥
बोधकथा-
चित्त निर्मळ हवे
देवदत्त अतिशय अस्वस्थ झाला होता. मानसिक ताणाबरोबर त्याची प्रकृतीही बिघडायला लागली होती. गावात एक सिद्ध साधू महाराज होते. देवदत्त त्यांच्याकडे गेला आणि आपली व्यथा सांगू लागला. ‘ ‘महाराज, अति विचार करून मी त्रासून गेलो आहे. या विचारांमुळे रात्र रात्र झोप येत नाही त्यामुळे अस्वस्थपणा फारच वाढतो. आता तर प्रकृतीवरही परिणाम होऊ लागला. यावर काहीतरी उपाय सांगा. ”
त्या साधू महाराजांनी देवदत्ताला आपल्या एका स्नेह्याकडे पाठविले आणि त्यांच्याकडे राहून चार-पाच दिवस त्यांची दिनचर्या पाहून येण्यास सांगितले.देवदत्त गुरुंची आज्ञा मानून त्याच्या स्नेह्यांकडे राहून त्यांची सर्व दिनचर्या पाहून परत आला. तरीही या सर्व गोष्टींचा त्याला कांहीच . उलगडा झाला नाही.
“तू तिथे काय पाहिलंस?” या साधू महाराजांच्या प्रश्नावर देवदत्त म्हणाला, ‘ अभ्यासण्यासारखी तुमच्या स्नेह्यांची दिनचर्या नाही. ते रात्री सर्व भांडी धुतात आणि रात्रभर त्यांच भांड्यांवर थोडीशी धूळ बसली असेल म्हणून सकाळी पुन्हा ती सर्व भांडी धुऊन काढतात.
मी जरा आश्चर्यानेच त्यांना या प्रकाराबद्दल विचारले? तेव्हा त्यांनी उत्तर दिले, ‘ ‘मी या मंगल कार्यालयाची व्यवस्था बघतो. धुळीने भरलेली भांडी किंवा कार्यालयातील अस्वच्छता मला आवडत नाही. धुळीने भरलेली भांडी स्वच्छ’ करून ठेवणे माझे कर्तव्य आहे. म्हणून ती मी सकाळ संध्याकाळ स्वच्छ करतो.
हे ऐकल्यावर साधू महाराज म्हणाले, “देवदत्ता, जे पाहायला हवं, समजून घ्यायला हवं ते तू समजून नाही घेतलंस. अरे, चित्त निर्मळ तर सुखच सुख. ”
तात्पर्य-
रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर प्रथम मनातील जाळी जळमटं काढून मन स्वच्छ करून रात्रीला आणि दिवसाला सुरुवात करावी.
पसायदान-
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
देशभक्तीपर गीत-
बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा
गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे
आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे
अटकेवर जेथले तुरंगि जल पिणे
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ?
पौरुषासि अटक गमे जेथ दु:सहा
प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरें
सद्भावांचीच भव्य दिव्य आगरें
रत्नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे
रमणीची कूस जिथे नृमणिखनि ठरे
शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा गृहा
नग्न खड्ग करिं, उघडे बघुनि मावळे
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे
दौडत चहुकडुनि जवें स्वार जेथले
भासत शतगुणित जरी असति एकले
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा
विक्रम वैराग्य एक जागि नांदती
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती
धर्म-राजकारण समवेत चालती
शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती
पसरे यत्कीर्ति अशी विस्मयावहा
गीत मराठ्यांचे श्रवणीं मुखीं असो
स्फूर्ति दीप्ति धृतिहि जेथ अंतरी ठसो
वचनिं लेखनींहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनिं वसो
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा
बालगीत-
पप्पा सांगा कुणाचे? पप्पा माझ्या मम्मीचे
मम्मी सांगा कुणाची? मम्मी माझ्या पप्पांची ।।धृ।।
इवल्या इवल्या घरट्यात, चिमणा चिमणी राहतात
चिमणा-चिमणी अन् भवती, चिमणी पिल्लेही चिवचिवती ।।१।।
आभाळ पेलते पंखांवरी, पप्पांना घरटे प्रिय भारी
चोचीत चोचीने घास द्यावा, पिल्लांचा हळूच पापा घ्यावा ।।२।।
पंखाशी पंख हे जुळताना, चोचीत चोचही मिळताना
हासते नाचते घर सारे, हासते छ्प्पर, भिंती, दारे ।।३।।
सामान्यज्ञान
✪ शिवाजी महाराजांच्या काळात कोणते संत होऊन गेले ?
➜संत तुकाराम, संत रामदास.
✪ शिवरायांचा राज्याभिषेक केव्हा झाला ?
➜१६७४.
✪ गोवळकोंडा ही कुणाची राजधानी होती.
➜कुतुबशाही.
✪ कोणाच्या सागरी मोहीमेमुळे अमेरिका खंडाचा शोध लागला ?
➜अमेरिगो व्हेस्पुसी.
✪ वाचनालयाची चळवळ महाराष्ट्रभर कोणी सुरु केली ?
➜गोपाळ हरी देशमुख.
✪ दिवसा वनस्पती कोणता वायू बाहेर सोडतात ?
➜ प्राणवायू. ( ऑक्सीजन )
✪ रात्रीच्यावेळी वनस्पती कोणता वायू बाहेर सोडतात ?
➜ कार्बनडाय ऑक्साईड.
✪ दुध कोणत्या घटक द्रव्यामुळे गोड लागते ?
➜ लॅक्टोज.
✪ अनुवांशिकता व गुण सातत्याची माहिती कशात सामावलेली असते ?
➜ डी.एन.ए.
✪ ‘ब’ जीवनसत्व एकूण बारा प्रकारची आहेत.त्यांना काय म्हणतात ?
➜ बी-काॅम्लेक्स.
✪ ‘मधुमेह’ झालेल्या रोगास कोणते औषध दिले जाते ?
➜ इन्स्युलिन
✪ हवेच्या प्रदुषणामुळे अलीकडे कोणत्या रोगाचे प्रमाण वाढले आहे ?
➜ फुफ्फुसांचा कर्करोग.
✪ एखाद्या वृक्षाचे वय कशाच्या आधारावर निश्चित करतात ?
➜ बुंध्यावरील वलये मोजून.
✪ तांबेरा रोग सर्वसाधारणपणे कोणत्या पिकावर पडतो ?
➜ गहू.
✪ ‘कात’ कोणत्या झाडापासून मिळतो ?
➜ खैर.
किल्ले माहिती-
रायगड
रायगड हा समुद्रतळाहून सुमारे ८२० मीटर अंदाजे २७०० फूट उंचीवर आहे. गडावर पोहोचायला जवळ-जवळ १४००-१४५० पायऱ्या आहेत.रायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. जावळीचा प्रमुख यशवंतराव मोरे हा जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला.
छत्रपति शिवरायांनी,६ एप्रिल १६५६ रोजी रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायगड शिवरायांच्या ताब्यात आला.कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद याच्याकडून लुटलेल्या खजिन्याचा वापर गडाच्या बांधकामासाठी केला.रायगडाची जागा अवघड ठिकाणी असल्यामुळे तसेच ते सागरी दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे असल्यामुळे छत्रपति शिवाजी महाराजांनी रायगडाची राजधानी म्हणून निवड केली.
महाराजांचा राज्याभिषेक याच ठिकाणी झाला. महाराजांचे त्यावेळचे शब्द बखरीत मिळतात. “दीड गाव उंच – देवगिरीच्याहुन दशगुणी उंच जागा. पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही. उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास जागा नाही. हे बघून महाराज खुषीने म्हणाले – तख्तास जागा हाच गड करावा.”
महाराजांच्या पश्चात सुमारे सहा वर्षे रायगड राजधानी होता. गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक-खुबलढा बुरुज व दोन-नाणे (नाना) दरवाजा. याशिवाय कठीण अश्या हिरकणी कड्यावरुन उतरणार्या हिरकणीची कथा प्रसिद्ध आहेच. गडावर जाण्यासाठी सध्या रोप वे ची सोय आहे.
दळणवळण सुविधा
पुण्याहून रायगडापर्यंत जाण्यासाठी थेट बससेवा आहे. ही बस पुण्यातून भोरमार्गे वरंधा घाटातून महाडमार्गे पाचाडगावातून रायगडच्या दोरवाटेच्या (रोप वेच्या) तळावरून पाचाड खिंडीत येते. येथून आपण पायउतार होऊन अवघ्या १४३५ पायर्या चढून गेलं, की रायगडमाथा गाठता येतो. पण या पाचाड खिंडीतच रायगडाच्या विरुद्ध दिशेस अवघ्या ४-५ मिनिटांच्या चढणीवर एक गुहा आहे. तिला म्हणतात “वाघबीळ’ किंवा “नाचणटेपाची गुहा!’ नवे ट्रेकर्स या गुहेला “गन्स ऑफ पाचाड’ असे म्हणू लागले आहेत.
गन्स ऑफ पाचाड
जगातील इतर सर्व गुहांपेक्षा या गुहेची रचना पूर्ण वेगळी आहे. पाचाड खिंडीतून इथवर चढून आले की गुहेचे एक तोंड दिसते. या तोंडातून आत गेले की समोर येणारे दृश्य अचंबित करणारे आहे. दोन गोलाकृती प्रचंड भोके पलीकडील बाजूला आहेत. तिथवर गेले, की पाचाडचा भुईकोट किल्ला, पाचाड गाव व पाचाडपासून ते पाचाड खिंडीकडे येणारा घाटरस्ता व्यवस्थित पाहता येतो.
या गुहेत सतत वाहणारा थंडगार वारा, एकापाठोपाठ येणार्या थंड वार्याच्या झुळुका आपला सारा थकवा दूर करतात. ज्या अर्थी अश्मयुगीन मानवाची इथे वस्ती होती. त्याअर्थी इथे जवळपास बारमाही पाण्याचे एखादे नैसर्गिक ठिकाण निश्चित असणार. त्याचा शोध घ्यायलाच हवा. रायगड पाहायला शेकडो-हजारो दुर्ग यात्रींना या वाघबीळ गुहेची कल्पनाच नसते. अश्मयुगीन मानवाचे जुने वसतिस्थान, ३ तोंडे असणारी गुहा, तेथून दिसणारा उत्कृष्ट देखावा, सतत वाहणारा थंड वारा याचं आकर्षण येथे भेट देणार्याला पडते.
पर्यटनस्थळ
शाळा महाविद्यालयांच्या आणि अनेक पर्यटन कंपन्यांच्या सहली रायगडावर आयोजित केल्या जातात. गडावर दोरवाटेने पाळण्यात बसून जाता येते, तर हजार-बाराशे पायऱ्या चढून रायगडावर पोहोचता येते. पर्यटकांनी अवश्य पाहावी अशी वाघबीळ किंवा नाचणटेपाची गुहा रायगडावर आहे.
व्यक्ती विशेष-
राजमाता जिजाऊ
पूर्ण नाव :~ जिजाबाई शहाजीराजे भोसले
जन्म :~ १२ जानेवारी १५९८, सिंदखेडराजा,बुलढाणा.
मृत्यू :~ १७ जून १६७४,पाचाड, रायगडचा पायथा
वडील :~ लखुजीराव जाधव
आई :~ म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई
पती :~ शहाजीराजे भोसले
जिजाबाई शहाजी भोसले
सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील. आईचे नाव म्हाळसाबाई. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.
भोसले व जाधवांचे वैर
पुढे लखुजी जाधव व शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला, एकदा एक हत्ती पिसाळला होता, हत्तीस पकडण्यास २ पथके तयार केली. पहिले जाधवांचे त्याचे नेतॄत्व दत्ताजीराव जाधव लखुजी जाधव यांचा मुलगा व जिजाबाई यांचा भाऊ.
दुसरे पथक भोसले यांचे त्याचे नेतृत्व संभाजी भोसले शहाजीराजे भोसले यांचे बंधू करत होते. यात दोघांचे भांडण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले. हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसले यांस ठार केले.हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर घेऊन सासर्यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावर वार लागला.
या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले.
नात्यांना, भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपूर उतरला होता.
जिजाबाईंची अपत्ये
जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती. जिजाबाईंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो सहा महिन्याचा झाल्यानंतर आपल्या मृत दीराच्या नावाप्रमाणे संभाजी ठेवले. त्यानंतर त्यांना ४ मुले झाली; चारही दगावली. ७ वर्षाचा काळ निघून गेला.
१९ फेब्रुवारी १६३० फाल्गुन वैद्य तृतीया सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवले.
राजांचे संगोपन आणि कुशल कारभार
शिवाजी १४ वर्षांचे असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. कुशल अधिकार्यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मोगलांच्या सततच्या स्वार्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले.
शिवाजीच्या राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाबाईम्नी नुसत्याच्गोष्टी सांगितल्या नाहीत तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणार्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले . शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईने लक्ष ठेवले .
शहाजीराजांची कैद व सुटका
अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वत: तंटे सोडवत.
शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.
राजांच्या प्रथम पत्नी
सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या.
एवढेच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज-सोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते. राजांच्या सर्व स्वार्यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वत: राज्याची धुरा वहात. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली.
शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून, इ.स. १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धाप
काळाने निधन झाले,या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.
जिजाबाई ही आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्या राजमाता होय.
Paripath,
Sutrasanchalan,
आजचा दिनविशेष,
दिनविशेष,
आजचा दिनविशेष,
मराठी दिनविशेष,
इतिहासातील जागतिक दिवस,
ठळक घटना,
वाढदिवस,
स्मृती दिवसांची संदर्भासहित
Like this:
Like Loading...
Related